Rajhans Podcasts
जगणं होईल हिरवंगार | Eknath Avhad |
“माणूस, निसर्ग, शाळा आणि पाखरांसारखी मुलं हे एकनाथ आव्हाड यांचं भावजीवन. त्यातही आई हे त्यांचं परमदैवत. आईचं काळीज आपल्या कवितेतून नेमक्या आणि हृदयस्पर्शी शब्दांतून व्यक्त करताना त्यांचा विशुद्ध आत्मस्वर आपल्याला ऐकू येतो. आईच्या आणि मुलांच्या संदर्भात लिहिलेल्या कविता वाचताना वाटतं, की या कवीमध्ये एक मूल आहे, एक सुजाण शिक्षक आहे आणि छोटे साने गुरुजीही आहेत. माणुसकीवरील प्रगाढ श्रद्धेमुळं जीवनाकडे पाहताना त्यांना 'जगणं होईल हिरवंगार' असं वाटणं नैसर्गिक आहे…”
खोटं खोटं पण खरं
वास्तव, जादुई वास्तव, आणि अतिवास्तवाच्या मिश्रणातून आकाराला आलेलं एक धूसर जग. त्यात आदिम वासना आहेत. भावनांचा कल्लोळ आहे. कथानकात घुसखोरी करणारी अन् त्यातून बाहेर पडणारी पात्रं आहेत. त्यांच्या दोऱ्या कधीकधी आपल्या हातात आहेत, अशा समजात गुरफटलेला लेखक आहे. तरीही या मजकुराबाहेरचा लेखक म्हणतो, 'वरील सर्व मजकूर खोटा आहे. किंबहुना खोटा खोटा आहे. पण खरा वाटावा असा आहे. कारण खोटं हे दुहेरी सत्य असतं.' प्रत्यक्ष अन् कल्पनेच्या अजब सरमिसळीतून साकारलेली अनवट कादंबरी. खोटं खोटं पण खरं..
निवळशंख पाणी | Dr .Rewa Dubhashi |
गोमंतकाच्या हिरव्यागर्द शेताभाटांत वाढलेल्या; पावसापाण्यात, पागोळ्यांत मनसोक्त भिजलेल्या एका निसर्गवेड्या मनस्वी मुलीच्या जडणघडणीच्या आणि व्यावसायिक स्थैर्यापावेतोच्या प्रवासातील हे कडू-गोड जीवनानुभव. तिच्या त्या एकाकी धडपडीची, ध्येयाप्रत पोहोचण्यासाठीच्या जिद्दीची ते जाणीव तर करून देतीलच; परंतु अशा संघर्षाच्या वाटेवरून चालणाऱ्यांना प्रेरकही ठरतील. या लेखांतील हृदयंगम शब्दवैभव आणि लोभस लालित्य आपल्याला खिळवून ठेवील; शिवाय सखोल व्यासंग, वैचारिक परिपक्वता आणि भावनिक उत्कटता यांनी परिणत असे शाश्वत जीवनमूल्यांवरील श्रद्धा दृढ करणारे हे लेखन समकालीन मराठी ललित लेखनालाही निश्चितच नवी उंची देईल. लेखिकेच्या आजवरच्या आयुष्यातील नानाविध बऱ्यावाईट अनुभवांच्या तरंग आणि भोवऱ्यांचा भर ओसरल्यावर शेवटी ओंजळीत उरलेले हे निवळशंख पाणी...